17/03/2023 16:54:23 PM Sweta Mitra 17
राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये भरती प्रक्रिया आता सुरु झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात ३२ हजार सेविका व मदतनीस पदांची भरती करण्यात येणार आहे. पदोन्नतीनंतर ३१ मार्चपूर्वी सर्वच प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आता भरतीसाठी महिला उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येतील. विधवांसाठी ४० वयाची अट आहे.
अंगणवाड्यांमधील मदतनीस किंवा सेविका पदांसाठी अर्ज करणाऱ्या महिलेला दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास त्यांना अर्ज करता येणार नाही. त्यासाठी छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मराठी भाषेशिवाय त्या उमेदवारास उर्दू, हिंदी, गोड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलगू, भिल्लोरी, बंजारा यापैकी किमान एक भाषा यायला हवी.
दरम्यान, उमेदवारांच्या गुणवत्ता यादीची पडताळणी जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व शहरातील उपायुक्त करतील. उमेदवारांची अंतिम निवड करण्यापूर्वी गुणवत्ता पडताळणी समितीकडून त्या नावांची खातरजमा केली जाईल. त्या समितीत दुसऱ्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्पातील एक कर्मचारी, एक पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका आणि इतर प्रकल्पातील एक कर्मचारी नेमले जातील. भरतीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका क्षेत्रात महिला व बालविकासचे उपायुक्त यांचा वॉच असणार आहे.