शेतकऱ्यांचे लाल वादळ स्थगित!


18/03/2023 17:39:46 PM   Sweta Mitra         1






शेतकऱ्यांचं लाल वादळ अखेर शमलं आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्च स्थगित करण्यात आला आहे. शेतकरी नेते जे पी गावित यांनी ही माहिती दिली आहे. तसेच सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे त्यांनी सरकारचे देखील आभार मानले आहेत.
शासनाशी चर्चा केल्यानंतर जे पी गावित यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आमच्या लॉन्ग मार्चला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही आणि मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा मार्च संपणार नाही अशी आमची भूमिका होती. त्याप्रमाणे आमची सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे.
या चर्चेत जवळजवळ 70 टक्के मागण्या राज्य सरकारने आमच्या समोर मान्य केल्या. उर्वरित मागण्या काही दिवसांमध्ये पूर्ण होतील अशी आम्हाला आशा आहे, असे जे पी गावित म्हणाले.
दरम्यान शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी दाखल होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना नाशिकला सोडण्यासाठी बसेस आणि दोन रेल्वेची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
सध्या दहा गाड्या आंदोलनस्थळी दाखल झाल्या आहेत. शेतकरी माघार घेतील तेव्हा याच गाड्यातून आम्ही त्यांना नाशिकला सोडणार आहे अशी प्रतिक्रिया कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या लॉन्ग मार्चमध्ये पुरुष शेतकऱ्यांप्रमाणे महिला शेतकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. पुंडलिक जाधव या 55 वर्षीय शेतकऱ्याचा काल मृत्यू झाला. या मृत्यूनंतर त्यांच्या गावाकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आमच्या मागण्या अगोदरच मान्य केल्या असत्या आणि त्याची अंमलबजावणी केली असती तर ही वेळ आली नसती अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच आमचा शेतकरी बांधवाचा मृत्यू झाला, त्याला शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी देखील मागणी पुंडलिक जाधव यांच्या गावकऱ्यांनी केली आहे.




also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  



TAGS :              Red storm farmers suspended